अजित पवारांकडून निधीवाटपात भेदभाव? फडणवीस म्हणाले...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरून जुंपलेली असताना आता त्यात निधी वाटपावरून आणखी भर पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी पहिलाच मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला. यावरूनच आता विरोधकांकडून टीका होत असताना यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रविवारी 23 जुलै रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या निर्णयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, 'केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांनाच निधी दिलेला नाही. भाजपा-सेनेच्या नेत्यांनाही दिला आहे आणि इतरही काही आमदारांना दिला आहे. सर्वांना हा निधी दिला आहे. त्यामुळे केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांना निधी दिला असं म्हणणं योग्य होणार नाही.' असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं
पुढे त्यांनी अतिवृष्टीवर देखील प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, 'राज्याच्या विविध भागात सातत्याने अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी १५ दिवसात किंवा एका महिन्यात जितका पाऊस आला पाहिजे तितका पाऊस दोन ते तीन दिवसात पडत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा तेवढा निचरा होत नाही आणि पाणी जमा होतं. त्यातून बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.' असेही ते यावेळी म्हणाले.