पटोलेंविरोधात थोरातांचे वरिष्ठांकडे पत्र? अशोक चव्हाण म्हणाले, आम्ही सोबत...
राज्यात नुकताच पाच जागांसाठीच्या निवडणुका पार पडल्या, परंतु, यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुक प्रचंड चर्चेत राहिली. या ठिकाणी उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. त्यानंतर बंडखोरीकरून अपक्ष उभे राहिलेले सत्यजित तांबे विजयी झाले. मात्र, विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मोठे गौप्यस्फोट केले आणि थेट महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले. त्यामुळे सध्या काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड गदारोळ सुरु आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी वरिष्ठांकडे पत्र दिले, अशी बातमी समोर आली आहे. यावरच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?
कसाब येथे बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले की, नाना पटोलेंविरोधात बाळासाहेब थोरातांनी वरिष्ठांकडे पत्र दिले असले तरी आम्ही सर्वजण नाना पटोलेंसोबत आहोत. महाविकास आघाडी एकत्रित असून नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आमचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. कसबा आणि चिंचवड येथील जागा बिनविरोध करण्याची भाषा भाजप करते आहे. मात्र, देगलूर, कोल्हापूर मध्ये अशाप्रकारे परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्यांनी कोणती भूमिका घेतली हे सर्वांनी पाहिले. त्यामुळे सोयीनुसार भाजप वागत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.
आज कसबा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसतर्फे रॅली काढण्यात आली. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन काँग्रेसकडून करण्यात आले, यावेळी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते त्याठिकाणी उपस्थित होते. त्याच वेळी अशोक चव्हाण यांनी हे विधान केले. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे बाळासाहेब थोरातांनी नाना पटोलेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे पत्र दिले, या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. नाना पटोलेंसोबत काम करणे आता अशक्य आहे, असे पत्रात बाळासाहेब थोरात यांनी म्हटल्याचे समोर येत आहे.