'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अंतरवालीत मुलाखती घेतल्या आहेत. आता उद्या, रविवारी समाजबांधवांशी संवाद साधून ‘लढायचे की पाडायचे’ हा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यावरच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलावर हल्लाबोल केला आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मुद्दा कळलाच नाही. जरांगे हे निवडणुका लढू शकत नाहीत. त्यांची निवडणुका लढवाव्या इतकी हैसियत नाही. राजकारण आणि निवडणुका यांच्या बाहेर जरांगे यांना कुठलाही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मनोज जरांगे हे निवडणुका लढवणार नाहीत. असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
लक्ष्मण हाके हे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच येत्या निवडणुकीत ओबीसी प्रश्नाबाबत ज्या नेत्यांनी पक्षांनी ओबीसी प्रश्नावर भूमिका घेतली नाही. अशा नेत्यांच्या आमदारकीच्या वाटा ओबीसी लोकांच्या वाड्या वस्त्यावरून जातात. त्यामुळे ओबीसी प्रश्नावर न बोलणाऱ्या नेत्यांना या निवडणुकीत आम्ही घरी बसवू. असा इशारा हाके यांनी दिला आहे.