पाकिस्तानात जमिनीचा वाद पेटला; दोन गटात तुफान राडा, 43 जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या कुर्रम या आदिवसी जिल्ह्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. या जिल्ह्यामध्ये जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केला. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. कुर्रम जिल्ह्यातील हिंसाचार प्रभावित भागात पोलिस आणि सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आले
24 जुलैपासून सुरू झालेला हा संघर्ष अजूनही सुरू आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानच्या वायव्यला असलेल्या कुर्रम या आदिवासी जिल्ह्यात जमिनीच्या वादामुळे हिंसाचार भडकला आहे. जमिनीच्या एका छोट्याशा तुकड्यासाठी दोन गट आमने-सामने आले आहेत.
हा हिंसाचार आणि अशांतता टाळण्यासाठी परिसरातील बहुतांश गावांमध्ये रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र, त्यामुळे नागरिकांना अन्न आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.