Jitendra Awhad Latest News
Jitendra AwhadLokshahi

"विधान परिषद निवडणुकीत पैशांचा जुगार, आमदारांना ५ कोटी रोख अन् १०० कोटींची कामं..."; जितेंद्र आव्हाडांचा घणाघात

विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा घोडेबाजार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर केला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Jitendra Awhad Press Conference: विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा घोडेबाजार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर केला आहे. "विधान परिषद जिंकलीय, आता विधानसभा जिंकणार, असं ते कालपासून सांगत आहेत. पैशाचा जुगार करून तुम्ही विधान परिषद जिंकली. तुम्ही आमदारांना पाच कोटी रोख आणि शंभर कोटींची कामं देण्याचं आमिष दाखवून त्या आमदारांना मतं द्यायला लावलीत. तुम्ही आमदार विकत घेऊ शकता, जनतेला विकत घेऊ शकत नाही. उद्या परवा नावं फुटल्यावर गावात आमदारांचा हालत काय होईल, ते बघाच. जनता त्यांना रस्त्यावर फिरणं कठिण करून टाकेल. जनतेला गद्दारी आवडत नाही. माझ्या मतावर निवडून आलेला आमदार पाच कोटीला स्वत:ला विकतो. हे जनतेला अजिबात आवडत नाही. ते २५ कोटी रुपयांना एक मत विकत आहेत. धंदा चांगला आहे, पण वाईट आहे, असं म्हणत आव्हाड यांनी महायुतीवर तोफ डागली.

जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, लाडक्या बहिणीच्या घरी नवऱ्याचा पगार पाठवायचा नाही. याला काही अर्थ नाही. अजून पुढची दोन वर्ष ठेकेदारांना बीलं मिळणार नाहीत. तुम्ही म्हणता, हजार कोटी रुपये दिले आहेत. त्या कोटी रुपयांचा पैसा कोण पाठवणार? त्याची बीलं कोण काढणार? थोड्या दिवसात एक टेंडर निघणार आहे. जमिनीचं अधिग्रहण केल्याशिवाय टेंडर काढू नये, असा सीव्हीसीचा स्पष्ट आदेश आहे. जमिनीचं अधिग्रहण न करता जवळपास ७५ हजार कोटी रुपयांचं टेंडर निघणार आहे.

वसई-अलिबाग कॉरीडोअरमध्ये खोट्या टपऱ्या उभारून ठेवल्या आहेत. फक्त लुटायची कामं सुरु आहेत. आचारसंहिता निघण्याआधी ७५ हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. पुढच्या दोन महिन्यात टेंडरचा पाऊस पडेल. आचारसंहिता येईपर्यंत धडाधड टेंडर काढले जातील. खिशात किती पैसे आहेत, माहित नाही. टेंडरची जाहीरात सरकार देतं. त्यामुळे जाहीरातही स्वस्तात पडते, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com