Ajit Pawar: शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले; "४६ हजार कोटी रुपये..."
Ajit Pawar Speech : आम्ही पण शेतकरी आहोत, त्यांच्या समस्या काय आहेत, हे आम्हाला माहित आहे. त्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. ४६ हजार कोटी रुपये राज्य सरकारला खर्च करावे लागणार आहेत. आता विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. ते म्हणतात, हा चुनावी जुमला आहे. निवडणुका आल्या आहेत, म्हणून ते करत आहेत. पण असं अजिबात नाही. मी ज्यावेळी अर्थसंकल्प सादर केला आहे, माझ्या माय माऊलींना देण्याचा प्रयत्न केला. तसच या महायुती सरकारने साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत वीजमाफी केली. मी शब्दाचा पक्का आहे. मी कधीही शब्द फिरवत नाही. मी दहा वेळा विचार करून शब्द देतो. एकदा शब्द दिला की, वाटेल ती किंम्मत मोजावी लागली तर मागे हटत नाही, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते सुरगाणा येथे भव्य शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, आपल्या राज्याचं उत्पन्न किती आहे, जीएसटीमधून आपल्या राज्याला किती उत्पन्न मिळतं, याचा सर्व अभ्यास मी केला आहे. सर्व जाती धर्माच्या १० लाख मुलांना स्टायपंड देत आहोत. हे सर्वांसाठी आहे. भेदभाव केला नाही. लाभार्थ्यांसाठी जे काही नियम लावले आहेत, त्या नियमात ते बसले पाहिजेत. या मुलांसाठी ती योजना आणली आहे. त्याच्यासाठी आपण १० हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. आदिवासी भागातील मुलं शिकलेली असतात. पण त्यांना अनुभव नसतो. आता राज्य सरकार त्यांना स्टायपंड देणार आणि सहा महिन्याचा कामाचा अनुभव मिळणार.
आम्ही प्रमाणपत्र देणार. त्या मुलाला प्रमाणपत्र मिळाल्यावर त्या तरुणांना नोकरी मिळेल. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. ८ लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या मुलींचं महाविद्यालयातील शिक्षणाचा शंभर टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. तिला कोणत्याही शिक्षणापासून आम्ही वंचित ठेवणार नाही. विचारपूर्व या योजना आणल्या आहेत. आम्ही फक्त योजनांवरच थांबलो नाही. आम्ही इतरांकडेही लक्ष दिलं आहे. कोतवालांचं, पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, असंही अजित पवार म्हणाले.