CM Eknath Shinde : "मुंबईकरांना मोकळा श्वास...."; मुख्यमंत्री शिंदेंनी 'त्या' प्रकल्पाबाबत दिली मोठी प्रतिक्रिया
CM Eknath Shinde Press Conference : सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आणि या राज्याचा विकास करण्यासाठी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. मी कालही म्हणाले, मी बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही, तर त्यांच्या पावलावर जीव टाकून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सर्वसामान्य माणसांचं सरकार म्हणून जनताही सरकारकडे आपुलकीनं पाहतेय. आम्ही दोन वर्षात विकासाचं काम केलं, पायाभूत सुविधांचं काम केलं. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो, कारशेडसारखी कामं आम्ही मार्गी लावली. लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उद्यानं झाली पाहिजेत. मला आनंद आणि समाधान आहे, महालक्ष्मी रेसकोर्समध्ये १२० एकर जमिन मुंबई सेंट्रल पार्कसाठी घेऊ शकलो, याचं मला समाधान आहे. तसच कोस्टलच्या बाजूला असलेलं १८० एकरचं गार्डन, असा ३०० एकरचा मुंबईत सेंट्रल पार्क होत आहे. मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी मोठा ऑक्सिजन पार्क आहे, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले,बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली कामं आम्ही करू शकलो, याचाही आनंद आणि समाधान आहे. सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलावं म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आम्ही सुरु केली. ज्या मुली उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, अशा मुलींसाठी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आम्ही उच्च शिक्षण मोफत केलं आहे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, लोकांना नोकऱ्या द्या. पण नोकऱ्या देणारे हात तयार करा. आज आम्ही ते काम करत आहोत. बारावी, डिप्लोमा, डिग्रीसाठी सहा, आठ, दहा हजार रुपयांचा स्टायपंड देण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे.
आतापर्यंत राज्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला नव्हता. तो निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी साडेसात हॉर्स पॉवरचं शेतीपंपाचं वीजबील माफ केलं. बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या योजना आम्ही सुरु केल्या. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांना या योजनांची आठवण झाली नाही. सर्व सामान्य लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही. लाडक्या भावालाही आम्ही दिलं आहे. ते लाडक्या भावाला किती महत्त्व देतात, हे सर्वांना माहित आहे. आम्ही लाडक्या भावाला ६, ८ आणि १० हजार स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असंही शिंदे म्हणाले.