भाजपच्या अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळेचं मोठं विधान; म्हणाले,"कुणाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करण्यासाठी..."
Chandrashekhar Bawankule Speech: आपल्या पक्षावर असणारी श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. ती अनेक काळापासून टीकून आहे. कुणाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करण्यासाठी आपण काम करत नाही. कुणी आमदार-खासदारासाठी काम करत नाही. आपण एका निष्ठेनं काम करत आहोत. त्यामुळे पुढचे चार महिने केंद्रातून नेतृत्व केलं जाईल. महायुतीचा निर्णय होईल, कोण लढेल? कोण लढणार नाही? हा प्रश्न नाहीय. १४ कोटी जनतेला न्याय देण्याचा प्रश्न आहे. या महाराष्ट्रातल्या १४ कोटी जनतेला न्याय द्यायचं असेल, तर मोदींच सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते भाजपच्या पुणे येथील अधिवेशनात बोलत होते.
कार्यकर्त्यांना संबोधीत करताना बावनकुळे पुढे म्हणाले, माझी वरच्या आणि खालच्या सभागृहाला हात जोडून विनंती आहे की, हे चार महिने पक्षावर आणि नेतृत्वार श्रद्धा ठेऊन आपण सर्वांनी काम करावं. इथून गेल्यावर सर्वांनी नवीन उर्जा घेऊन जावी. इथून गेल्यावर प्रचंड ताकदीनं काम करावं. मतदान केंद्रांचं आता विकेंद्रीकरण होणार आहे. नवीन मतदार नोंदणी होणार आहे. २०२४ ची डिलीटेड मतं पुन्हा २०२४ मध्ये येणार आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे.
आपण आपल्या मनात कोणतीही निराशा ठेवण्याचं कारण नाही. देशात मोदींचं सरकार आलं आहे. अमित भाईंसारखे पोलादी पुरुष आपल्यासोबत आहेत. तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे आपल्याला निराश होण्याचं कारण नाही. जिद्दीनं संघर्ष करणे हा आपला पिंड आहे. विचारांची लढाई लढण्याचा आपला पिंड आहे. कार्यकर्ता म्हणून पक्ष आपला श्वास आहे. देशहितासाठी आपण कार्यरत राहणे, आपल्या काळाची गरज आहे.
प्रत्येक बुथवर पुन्हा एकदा नवी संघटना बांधण्याचं काम करायचं आहे. २-४ हजाराच्या फरकाने ज्या दहा लोकसभा हरल्या. सात विधानसभा मतदारसंघात थोडा फरक पडला. पण या व्यासपीठावरील कार्यकर्त्यांनी आणि वरच्या नेतृत्वानं निर्णय केला की इथून गेल्यावर मी प्रत्येक विधानसभेत गेल्यावर दहा मतं नोंदवील. १८ ऑगस्टपर्यंत मतदाराची नोंदणी आहे. मी तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहे, महाराष्ट्राच्या विधानभवनावर महायुतीचा भगवा फडकवायचा असेल, तर दहा मताची गरज प्रत्येक बुथवर आहे. तुम्ही जर दहा मतांचं राजकारण केलं, तर महाराष्ट्रात २०० वर जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा माझा दावा आहे. तुमच्यावर आणि व्यासपीठावर विश्वास आहे, असंही बावनकुळे म्हणाले.