'अशी आदळ आपट करण्याचे काय कारण' जरांगे पाटलांच्या आरोपांनंतर भुजबळांची खोचक टीका
मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असे त्यांनी म्हटले. दरम्यान मनोज जरांगे उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थान सांगर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी 'त्यांचेच लोक त्यांच्या विरुद्ध आरोप करायला लागले आहेत. त्यामुळे कदाचित आता त्रस्त होऊन त्यांनी हे अकांड तांडव सुरु केले असेल, अशी टीका केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण विधान मंडळात एकमताने दिलेले आहे. सर्व आमदारांनी सर्व पक्षांनी एकमताने ते दिलेले आहे. सर्व विरोधी पक्षाचे नेत्यांनी सांगितले होते की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचे काम करा त्या प्रमाणे ते झाले आहे. आता त्यानंतर जरांगे यांनी अशी आदळ आपट करण्याचे काय कारण आहे. आता त्यांचेच लोक त्यांच्या विरुद्ध आरोप करायला लागले आहेत. त्यामुळे कदाचित आता त्रस्त होऊन त्यांनी हे अकांड तांडव सुरु केले असेल.
मनोज जरांगे पाटलांचं पितळ उघडं पडलं जात आहे. त्यांनी केलेल्या गुप्त बैठका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाला त्यांनी जे काही गुमराह केलंय, त्यामुळे आता त्यांचेच लोक बोलायला लागलेले आहेत. कदाचित त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल आणि त्यामुळे ते असे काही तरी बोलत आहेत, अशी टीका छगन भुजबळांनी केली आहे.
तुम्ही अगोदर तब्येत सांभाळा. मला मोठे आश्चर्य वाटते की, उपोषण करत असतानाही त्यांचा आवाज फार खणखणीत आणि मोठा आहे. हे कसे काय आहे आणि ते 10 लोकांना सुद्धा ऐकत नव्हते. एवढी शक्ती उपोषणकर्त्याला कशी आली, हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे आश्चर्य आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विरोधात कट रचल्याचा आरोप करत मनोज जरांगे उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थान सांगर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे यांनी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे, मी रस्त्यात मलो तरी मला सागर बंगल्यावर न्या, असे देखील जरांगे म्हणाले.