सातारा जिल्ह्यात खेळाडू स्टार मात्र खेळाचे मैदान झाले बेक्कार
प्रशांत जगताप|सातारा: सातारा जिल्ह्याने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू देशाला दिले. जिल्ह्यातील अनेक खेळाडू देश - परदेशात चमकत आहेत. जिल्ह्याचे नावलौकिक करत आहेत. मात्र 2005 साली निर्माण केले छत्रपती शाहू स्टेडियम आजही त्याच स्थितीत उभ आहे, त्यात काही सुधारणा झालेली नाही.
मैदानावर सराव करण्यासाठी अनेक सुविधांची कमतरता असल्याने कित्तेक खेळाडूंना सरावासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यात जावे लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. ॲथलेटिक्स खेळाडूंना महिन्याकाठी 30 हजाराहून अधिकचा खर्च येत असून त्यात सिंथेटिक मैदान नसल्याने इतर जिल्ह्यातील मैदानाचे भाडे भरून सराव करावा लागतो. यामुळे अधिकचा खर्च वाढत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. खेळाडूंबाबत प्रशासन आणि राज्यकर्ते उदासीन असल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्याला एकच मैदान आहे मात्र त्याला देखील केवळ व्यवसायाचे स्वरूप आले आहे. हे मैदान खेळाडूंसाठी बांधले की गाळे धारकांसाठी बांधले असा प्रश्न उपस्थित होत आहे. सराव करून थकलेल्या खेळाडूंना पिण्यासाठी पाणी, महिला खेळाडूंना चेंजिंग रूम तसेच आराम करण्यासाठी रूम्स यासारख्या सुविधा नाही आहेत. मैदानावर सामने भरवले जातात मात्र प्रेक्षा गॅलरीची झालेली दुरवस्था, फुटलेल्या खिडक्या, धूळधाण यामुळे ही गॅलरी बंद अवस्थेत आहे.
400 मीटर धावपट्टी असलेल्या ट्रॅकची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारावर टाकलेल्या लोखंडी जाळ्या उघडल्या असल्यामुळे धावताना अनेकांच्या पायाला लागून गंभीर जखमा देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. खडी ट्रॅकवर आल्याने धावताना पायाला इजा होऊन अनेक खेळाडूंनी मैदानावरच यायचं बंद केले आहे. मैदानावरच झाडी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून देखील कर्मचाऱ्याकडून साफसफाई होत नाही.
एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना शाहू स्टेडियमच्या सिंथेटिकट्रॅकसाठी साडेबारा कोटी रुपये देण्याचे जाहीर केलं होतं, तसे बॅनर देखील सातारा शहर आणि परिसरात शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश मोरे यांनी झळकावले होते. केवळ प्रसिद्धीसाठी हा स्टंट करण्यात आला होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खरंच जिल्ह्याचं नाव वाढवायचा असेल तर खेळाडूंना मैदानी सुविधा देणे गरजेचे आहे मात्र प्रशासन आणि राज्यकर्ते सातारा जिल्ह्यासाठी उदासीन आहेत असं एकंदरीत या मैदानाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी देखील याकडे लक्ष देऊन खेळाडूंच्या मागण्या आणि समस्या दूर कराव्यात अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.