"चंद्रकांत पाटलांनी कशावर दगड ठेवला हे..."; अजित पवारांच्या उत्तरानं पिकला हशा

"चंद्रकांत पाटलांनी कशावर दगड ठेवला हे..."; अजित पवारांच्या उत्तरानं पिकला हशा

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात तातडीनं अधिवेशन बोलवून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधपक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील परिस्थिती लक्षात घेता तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत दिल्ली दौरे झाले असेल तर आता राज्याकडं लक्ष द्यावं असं आवाहन अजित पवारांनी केलं. मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी मिश्किल भाषेत उत्तर दिलं. अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, कुणी कशाव दगड ठेवला हे त्याचं त्यांना माहिती असं अजित पवारांनी म्हणताच हशा पिकला. सध्या त्यांच्या आईचं निधन झालं असून, तो शोकमग्न आहेत. काही दिवस जाऊ द्या मी सभागृहात सांगेन कुणी कुठं दगड ठेवला अन् धोंडा ठेवला असं उत्तर अजित पवारांनी दिलं.

अजित पवार यांनी एकूणच राज्यातील परिस्थिती पाहता, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. एस. डी. आर. एफच्या अटी शर्थी बाजुला ठेवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी पवारांनी केली. दिल्लीत वेगवेगळ्या कामानिमित्त दौरे होत असतील, मात्र आपल्या भागातील लोकांची मदत करायची नाही का? असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी तातडीनं अधिवेशन बोलवण्याचं आवाहन केलंय. तसंच तिरुपती बालाजीला गेलेल्या वाहनांवर शिवाजी महाराजांचा फोटो काढण्यावरुन निर्माण झालेल्या वादावर देखील मी मिलिंद नार्वेकर यांना अधिकृत माहिती द्यावी असं मी सांगितलं असल्याचं पवार म्हणाले. तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील तिथल्या मुख्यमंत्र्यांना बोलून या प्रकरणाची चौकशी करुन लोकांना माहिती द्यावी असं पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com