Vijay Wadettiwar : पुरे झाली ही थट्टा...! तीन पक्षाच्या सरकारकडून शेतकऱ्याला ३ रुपयांची मदत!
विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुरे झाली ही थट्टा. तीन पक्षाच्या सरकारकडून शेतकऱ्याला ३ रुपयांची मदत! एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजना सरकारने आणली. गावागावात गाजावाजा केला. प्रत्यक्षात तीन लाखांच्या नुकसानीसाठी तीन रुपयाची मदत दिली गेली. यवतमाळ जिल्ह्यात हे प्रकार उघड झाल्यानंतर वाद वाढला.
शेतकऱ्यांचा योजनेवरचा विश्वास उडाला. तीन रुपयांसाठी कशाला खटाटोप करायची हा विचार शेतकऱ्यांमध्ये बळावला आहे. त्याचे परिणाम यंदा दिसू लागले आहेत. खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. नागपूर विभागातील ५८ टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला नाही. सर्व्हरची समस्या आणि सरकारच्या निकषांतील तांत्रिक दोष ही कारणे दिली जात असली तरी शेतकऱ्यांना या सरकारवर विश्वासच उरलेला नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, बरं हे सारे इथेच थांबत नाही. पीकविमा काढण्याची टक्केवारी कमी होण्याचे आणखी एक कारण खुद्द सरकारी अधिकारीच सांगतात. पूर्व विदर्भात धानाची लागवड केली जाते. पाण्यातले पीक असल्याने अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही केंद्राच्या निकषातच बसत नाही. हे निकष बदलविण्यात यावे, अशी मागणी कृषी विभागाकडूनच केंद्र सरकारकडे केली जात आहे. लाभच मिळत नाही तर पीक विमा काढायचा तरी कशाला? परत तीन रुपयांची मदत घेऊन स्वत:ची थट्टा कशाला करून घ्यायची ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.