राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सगळीकडे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार म्हणाले की, पूर्व विदर्भ, पुणे,कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि परिसरातील भागात सुद्धा अशीच स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. आपत्त्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे लहान व्यापारी आणि दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
यासोबतच ते म्हणाले की, गरीब कुटुंबाच्या घराचे नुकसान झाले आहे. या सर्वांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून महाराष्ट्रावर आलेल्या संकटात यावेळी तरी कोणता भेदभाव न करत पुढे येऊन मदत करावी ही आमची मागणी आहे. या पावसात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना उभे करणे हे देखील आव्हान आहे, सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.