राज्यातील संकटांवर दलाईलामांनी व्यक्त केले दु:ख
राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. राज्यात सध्या पूर , पुराचे पाणी , नुकसान आणि पूर ओसरून झाल्यावर नुकसान ग्रस्त भागात मंत्र्याचे दौरे याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तिबेटींचे धर्मगुरू दलाईलामा यांनी महाराष्ट्रातील पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे जी जीवितहानी झाली आहे त्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या एका संदेशात त्यांनी म्हटले आहे की, या बातम्या वाचून आणि त्यातील जीवित हानी व मालमत्तेच्या हानीचे वृत्त ऐकून आपल्याला अतिव वाईट वाटले. त्यांनी या दुर्घटनेतील मृतांना शांतता लाभावी यासाठी प्रार्थना केली असून त्यांच्या कुटुंबीयांविषयीही सहानुभूती प्रकट केली आहे. राज्य सरकार आणि संबंधीत अधिकारी आपद्ग्रस्तांना मदत करीत असतीलच पण महाराष्ट्रातील लोकांविषयी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी या मदत कार्याला आर्थिक मदत देण्याची सूचना मी आमच्या ट्रस्टलाहीं केली आहे.