Sanjay Raut : कपट आणि कारस्थानी हा चेहरा संघाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, अशा लोकांमुळे संघ बदनाम झाला
मुंबईतील शाखा प्रमुखांची काल बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावर आता माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली नाही. तर तलवार उपसली आणि घाव घातला. देवेंद्र फडणवीस देखील संघचालकच आहेत ना. मग संघ विचारांच्या माणसाने कोणती संस्कृती महाराष्ट्रात पाळली. कोणती नीती, कोणते नियम पाळले. माणूस किती अनितिमान, असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर असू शकतो. कपट आणि कारस्थानी हा चेहरा संघाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. अशा लोकांमुळे संघ बदनाम झाला.
उद्धवजींनी काल जे काही सांगितले तो संताप त्यांनी समजून घेतला पाहिजे. उद्धवजी म्हटले एक तर तुम्ही राहाल, किंवा मी राहीन. त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही. तू हा वापरला. तू राहशील किंवा मी राहीन. आम्ही म्हणतो आम्हीच राहू ते जातील. पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन हे जसं हवेत विरुन गेलं. तसेच आहे हे. तुम्ही जाणार आहात, आम्ही राहणार आहोत. ही महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई आहे. संघाला फार मोठी परंपरा आहे. हे आम्ही मानतो. पण ज्या पद्धतीने अशा या लफंग्यांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे दळभद्री, घाणेरडे राजकारण सुरु केलं. त्याचे परिणाम महाराष्ट्र आज भोगतोय.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस हे आहेत. उद्धवजी काल बोलले, मी अनेकदिवसांपासून सांगतो आहे. आम्ही सगळे या महाराष्ट्रासाठी एकत्र होतो. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल जे आव्हान दिलेलं आहे, ते एका मर्द मराठ्याचे आव्हान आहे. एका महाराष्ट्र प्रेमीचा, महाराष्ट्र स्वाभिमानीचा आव्हान आहे. असे संजय राऊत म्हणाले.