Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं खलनायक आहेत
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवणं आणि तुरुंगात टाकणं यासाठी फक्त गृहमंत्रालयाचा वापर होत आहे. आपल्या पक्षाचे जे गुंड, चोर आहेत त्यांना संरक्षण देणं. गृहमंत्री फडणवीस यांनी ज्यांना ज्यांना संरक्षण दिलं आहे पोलिसांचे, त्यातलं 80 टक्के लोक लफंगे आहेत. त्यांच्यावर खटले आहेत. तुम्ही यादी काढा.
मुंबईमध्ये अशाप्रकारच्या असंख्य लोकांना संरक्षण दिलं. जनता वाऱ्यावर आहे, देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांना अशाप्रकारची सुरक्षा प्रदान केलेली आहे. हे कोण आहेत तुमचे? मी जे वारंवार म्हणतो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं खलनायक आहेत. माझा त्यांचा व्यक्तिगत वाद नाही. ज्याप्रकारचे राजकारण त्यांनी महाराष्ट्रात केलं आहे, हे राज्य त्यांना माफ करणार नाही. इतिहासामध्ये त्यांची नोंद खलनायक, कळीचा नारद म्हणूनच होईल.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, त्यांना या राज्याचे भल करण्याची संधी ईश्वराने दिली होती. पण त्यांना ते पुढे नेता आलं नाही. आज ते दुदैवाने या राज्यातल्या जनतेत अत्यंत तिरस्कारनीय व्यक्ती म्हणून आज जर कोणते नाव असेल महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीस. त्यांनी पदाचा, सत्तेचा पूर्णपणे गैरवापर लोकशाही खतम करण्यासाठी आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केलेला आहे. असे संजय राऊत म्हणाले.