Sanjay Raut : या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस ही राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे. राजस्थान, मध्यप्रदेश अनेक भागांमध्ये मुख्यमंत्री नेमलं गेले. कुणाला माहित नाही. तसं त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहित झालेत. देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती. पण कपट कारस्थानाचे राजकारण, दळभद्री राजकारण, महाराष्ट्राला कलंकित करण्याचे राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केला.
आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करत आहे. या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते. याला जबाबदार ते स्व:ता आहेत. एक उत्तम संधी त्यांनी नेतृत्व करण्याची गमावली. भारतीय जनता पक्षाने या महाराष्ट्राचे जेवढे नुकसान केलेलं आहे. त्यांच्या कपटनितीने, ते भरुन येणं सोपं नाही. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी जी घाण निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल. या राज्याच्या जनतेनं आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला आणि या राज्याची जनता आम्हाला विधानसभेला देखील आशीर्वाद देईल.
यासोबतच ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी इतकंच सांगेन त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी तुरुंगात टाकून राज्य करण्यासाठी त्यांनी गृहखात्याचा गैरवापर केला. त्यांच्या अवतीभोवती अशी लोक आहेत भ्रष्ट, कलंकित. चांगला गृहमंत्री असता तर त्यांनी पाच मिनिटात अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात टाकलं असते. इतकं भ्रष्ट लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. पण त्यांच्यासोबतीने ते राज्य करत आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. असे संजय राऊत म्हणाले.