अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी संजय राऊत म्हणाले...
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्यात गुंडराज सुरु आहे सातत्याने सांगतोय. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य. पोलीस हे गुंडांचे संरक्षक झाले आहेत. सरकारी कामं गुंडांना दिली जात आहेत. पोलीस आणि गुंड ठाण्यात एकत्र. 2024 नंतर या सर्वांचा हिशोब दिला जाईल. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हते.
देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? तुम्ही अपयशी आणि अकार्यक्षम गृहमंत्री आहात. फडणवीस चाय पे चर्चा करण्यात व्यस्त आहेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी गृहमंत्री झालेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. राज्याचं सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा. राज्याचे मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेवर कधी बोलणार? रोज फक्त गुंडगिरीच्या बातम्या समोर येत आहेत. असे राऊत म्हणाले.