सांगलीत निघणार मराठा मोर्चा; जिल्हाभर बैठकांचा जोर
संजय देसाई | सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह समाजाच्या प्रलंबित प्रश्नासाठी रविवार १७ सप्टेंबर रोजी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. शहरात विविध बैठकांसह आता गावामध्येही कार्यकर्ते एकत्र येत मोर्चात सहभागी होण्यासाठीचे नियोजन करत आहेत. २०१६ मध्ये झालेल्या मराठा क्रांती मोर्चा इतकाच भव्य दिव्य आणि संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरेल, असा मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनस्तरावरून उदासीनता दिसून येत असल्याने समाजामध्ये असंतोष वाढत आहे. अंतरवाली सराठी (जि. जालना) येथे मराठ आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर या आंदोलनाला आता धार आली आहे. गुरुवार ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारण्यात आल्यानंतर लगेचच मोर्चाची हाक देण्यात आली होती. यानंतर आता सांगली येथे रविवार भव्य मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये मराठा आरक्षण, तरुण-तरुणींच्या प्रलंबीत नियुक्त्या यासह इतर प्रमुख मागणया करण्यात येणार आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज 17 दिवसानंतर उपोषण सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उपोषण मागे घेण्यात आले. तत्पुर्वी, मनोज जरांगे पाटलांनी सरसकट आरक्षणाची मागणी केली असून सरकारला एका महिन्याचा वेळ दिला आहे.