Rohit Pawar : दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला

Rohit Pawar : दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल आणि तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचे द्योतक होते. हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल तरी बिहार आणि आंध्रच्या नेत्यांनी केलेल्या bargaining आणि पाठपुराव्याचे हे फलित म्हणावे लागेल. कदाचित महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्र हितासाठी थोडा जरी पाठपुरावा केला असता तर महाराष्ट्रासाठी एखादी घोषणा झाली असती. असो या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com