मोदी 3.0 सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार असून सकाळी 11 वाजता बजेट सादर होईल. अर्थमंत्री सीतारामन या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या बजेटमध्ये काय काय घोषणा होणार हे पाहणं आता महत्वाचे असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, हा जो एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे त्यातून आमच्या अपेक्षा खूप आहेत. पण त्या अपेक्षा गेल्या 10 वर्षात पूर्ण झाल्या नसतील तर या त्यांच्या एनडीए काळातल्या पहिल्या सरकारमध्ये झाल्या तर आम्हाला आनंदच आहे. आमच्यादृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारी या देशातला जो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. या संदर्भातील जर काही निर्णय या अर्थसंकल्पात आम्हाला दिसले तर त्याबाबत आम्ही लगेच स्वागत करु.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत. महाराष्ट्र सरकारवर साधारण 10 लाख कोटीचे कर्ज असताना निवडणुकीसाठी काही घोषणा केल्या जातात. पैसे कुठून आणणार, केंद्र सरकार देणार आहेत का? असे अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत. बिहार आणि आंधप्रदेश या दोन राज्यांच्या पाठिंब्यावर सध्याचे सरकार त्यांच्या टेकूवर उभा आहे. या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशल पॅकेज किंवा स्पेशल स्टेटसची मागणी केली. राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली. अशा प्रकारचे वचन देऊन त्यांनी हा पाठिंबा मिळवला. तर या दोन राज्यांना दिलेली वचन आपण पाळणार का? काल बिहारच्याबाबतीत त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, बिहारला स्पेशल स्टेटस मिळणार नाही. याचा अर्थ आंध्रालाही मिळणार नाही. या मुंबईची लूट आणि ओरबडणे केंद्र सरकारने थांबवायला हवं. मुंबईतून मिळणारा महसूल हा महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी, विकासासाठी वापरला गेला पाहिजे. मुंबईतला उद्योग हा मुंबईतच राहिला पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले.