टिळकांचे घराणे वापरून सोडून दिलं; उध्दव ठाकरेंची टीका,...तर शिवसैनिक म्हणवून घेऊ नका
मुंबई : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे वातावरण आता तापले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचारासाठी सुरु आहे. अशातच, ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. उध्दव ठाकरेंनी फेसबुकवर लाईव्हच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आमच्यासोबत राहिले तर तांदळातले खडे आणि तुमच्यासोबत गेले तर तर धुतल्या तांदळासारखे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
मी प्रत्यक्ष व्यासपीठावर उपस्थित नाहीये. बऱ्याच दिवसांनंतर मी या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय. जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा याच माध्यमातून आपण महाराष्ट्र सांभाळलं. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. अजित पवार उपमुख्यमंत्री होते. जयंतराव माझे मंत्रिमंडळातील सहकारी होते. आता सगळ्यांचा कठीण काळात साथ देणाऱ्या सहकाऱ्यांनो असा उल्लेख करतोय. वाटलं नव्हतं, अशा पध्दतीने पोटनिवडणूक लढवावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
विरोधकावर मात करणं ही जिद्द बाळगावी लागते. पण, आपला विरोधक निघून जावा आणि पोटनिवडणूक लागावी असं कोणालाच वाटत नाही. लक्ष्मण आणि मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहतो. आजची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. त्या मताचा आदर करतो. पण, लोकशाही मधला मोकळेपणा आता जिवंत आहे का? ज्यांना असं वाटत की ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. त्यांनी टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता दुसऱ्याला दिली. तेव्हा सहानुभूती कुठे गेली? तिथे तर टिळकांचे घराणे वापरून सोडून दिलं, असा आरोप त्यांनी केला आहे.
गिरीश बापट यांच्या प्रचाराला बाळासाहेब देखील आले होते. गिरीश बापट हे गंभीर आजारी असताना मी त्यांचे फोटो पाहिले. ऑक्सिजनच्या नळ्या नाकात टाकून त्यांना प्रचारात उतरवलं. हा अमानुषपणा कुठला? ही कुठली लोकशाही? वापर करून सोडून देणार. अशा पक्षाला आपण मतदान करणार का, असा सवाल उध्दव ठाकरेंनी विचारला आहे.
ज्या पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी तेव्हा जसं वागलं, त्याच्यापेक्षा भयानक निर्घृणपणे भाजप वागत असेल तर मी सर्व शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे शिवसेनेला मुळासकट ते उखडायला निघालेत. आता महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर आपलं चिन्ह चोरलं, आपलं नाव चोरलं, आपल्यामध्ये फूट पाडली. अशा भाजप पक्षाला मदत झाली नाही पाहिजे. जर मदत केली तर शिवसैनिक म्हणवून घेऊ नका, अशा शब्दांत उध्दव ठाकरेंनी साद दिली आहे.
मी जगताप वहिनींना एवढेच विनंती करतो की तुमच्या आणि कुटुंबियांबद्दल नेहमीच आदर आमच्या मनात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनात देखील आहे. परंतु, सहानुभूती मात्र भाजपसाठी दाखवायची राहिलेले नाहीये. तुमचा वापर करून भाजप आपली पाशवी पकड घट्ट करू पाहत असेल तर ती मात्र सोडवावीच लागेल आणि नाईलाज म्हणून आम्हालाही निवडणूक जिंकावीच लागेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
आम्ही काही केलं, नाही केलं तरी भ्रष्टाचार म्हणून बोंब मारले जाते. बीएमसी मधील भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणतात. हिम्मत असेल तर पिंपरी-चिंचवड मधील महानगरपालिकेची चौकशी करा. तिथला स्थायी समिती अध्यक्ष याला रंगेहात पकडण्यात आलं हे विसरू नका. याची देखील चौकशी लावा. सगळ्यांची चौकशी लावा. आमदारांनी कशी महापालिका धुतली. कोणत्या कॉन्ट्रक्टरचे लाड पुरवून कोणाला 400 कोटींचा प्रसाद दिला आहे याची देखील चौकशी लावा. तुमच्या पण परिसरात जवळ-जवळ 50 हजार अनअधिकृत बांधकाम आहेत त्यांची चौकशी लावा, अशी मागणी उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.