Barsu Refinery Project शेतकऱ्यांचे सर्व गैरसमज दूर केले जातील; उद्योगमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुंबई : कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.
रिफायनरी हा प्रकल्प आल्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. महाराष्ट्राचा जीडीपी वाढणार आहे. म्हणून हा प्रकल्प बारसुमध्ये करावा, अस पत्र उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान यांना दिले आहे, असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे. तर, शेतकऱ्यांचे सर्व गैरसमज दूर केले जातील. मला कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यायचं नाही. अनावधानाने प्रशासनाकडून माध्यमांशी गैरवर्तन झाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.
भास्कर जाधवांच्या टीकेवर उदय सामंत म्हणाले, ते काय म्हणाले यांच्याशी माझा संबंध नाही. भास्कर जाधव, राजन साळवी हे जिल्ह्यातले नेते त्यांना विनंती आहे की प्रकल्प येण्यासाठी सहकार्य करावे. जसे विरोधक आहे तसे समर्थक देखील आहे. वाईट घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. समृद्धी महामार्गाच्या वेळी जसा न्याय दिला तसा न्याय शेतकऱ्यांना दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजापूर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पोलिसांनी जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे.