मोठी बातमी ! काॅंग्रेस हायकंमाडकडून आशिष देशमुखांचे निलंबन; काॅंग्रेसच्या गोटात खळबळ
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत असताना आता त्यातच काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. कॅाग्रेस हायकंमाडने आशिष देशमुख यांना पक्षातून निलंबित केले आहे. देशमुख यांनी नुकताच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर उघडपणे टीका केली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.
आशिष देशमुखांच्या या विधानामुळे काॅंग्रेसमध्ये अंतर्गत वाद चांगलाच निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिस्तपालन समितीची नेमणुक करण्यात आली होती. सोबतच काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. त्या नोटीशीला त्यांनी उत्तर न दिल्यामुळे त्यांच्यावर आता पक्षाकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नेमंक काय म्हणाले होते आशिष देशमुख?
काही दिवसांपूर्वी मविआची छ. संभाजीनगरमध्ये सभा पार पडली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ऐनवेळी सभेला गैरहजर राहिले होते. त्यावरच बोलताना आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. 'नाना पटोले हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा घालत आहेत. नागपूरमध्ये 16 एप्रिलला मविआची वज्रमूठ सभा होत असताना नाना पटोले सांगतात की, 21 ते 25 एप्रिलदरम्यान राहुल गांधींची नागपूरमध्ये सभा होणार आहे. राहुल गांधींची 16 एप्रिलऐवजी वेगळी वेळ मागणे हे नाना पटोलेंच्या वेगळी चूल मांडण्याचे संकेत असल्याचा दावा त्यांनी केला होता.