तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते आता...; एकनाथ शिंदेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर
मुंबई : जोडे पुसण्याच्या लायकीची लोकं सत्तेवर बसले आहेत, अशी टीका उध्दव ठाकरेंनी आज शिंदे गटावर केली होती. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उध्दव ठाकरेंना उत्तर दिले होते. काहीही श्रम न करता पैसा, पद मिळाले की मेंदू काम करेनासा होतो, असा निशाणा शिंदेंनी साधला होता. यावर आता ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर केली होती.
यावर सुषमा अंधारेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कष्टकऱ्यांच्या कष्टाबद्दल आम्हाला अपार आदर आहे. मी स्वतःखडतर संघर्षातून ऊभी राहतेय. आपण उल्लेख केलेली कष्टाची कामे सध्या मंत्रिमंडळातील कोणता मंत्री करत आहे बरं, असा प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदेंना विचारला आहे. कारण तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते आता अब्जाधीश आहेत. कृपया नोंद घ्यावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, कामगार सेनेच्या मेळाव्यात उध्दव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात येणारी जोडे बनवणारी कंपनी तामिळनाडूला गेली. आणि हे जोडे पुसत बसले आहेत. जोडे पुसण्याच्या लायकीची लोकं सत्तेवर बसले आहेत, अशी टीका उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती.