सत्तार यांच्यावर कारवाई झाली तशीच कारवाई आपल्या प्रकरणात का करण्यात आली नाही?- सुषमा अंधारे
राज्यात सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरु आहे. अशातच मंत्री सत्तारांनी केलेल्या सुप्रिया सुळेंबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे वातावरण प्रचंड तापले आहे. त्यानंतर आता राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या विरोधात अर्वाच्य भाषा वापरली तरी राज्य महिला आयोगाकडून त्यावर कारवाई करण्यात आली नाही, रुपाली चाकणकरांना आपण या संदर्भात दोन वेळा फोन केला पण त्यांनी तो उचलला नाही असा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. जी कारवाई सु्प्रिया सुळे यांच्या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आली ती कारवाई आपल्या प्रकरणात का करण्यात आली नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
काय म्हणाल्या अंधारे?
मी महिला आयोगावर टिका करत नाही, तर महिला आयोगाच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छिते की त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करावी. मी रुपाली चाकणकर यांना दोनवेळा गुलाब पाटील यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात फोन केला, पण चाकणकर यानी फोन उचलला नाही. असे खळबळजनक विधान त्यांनी यावेळी केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, माझा महिला आयोगालाही सवाल आहे की जर अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाब पाटील यांना नोटीस का बजावत नाही. दोघेही गुन्हेगारच आहेत. राज्य महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये. फक्त अब्दुल सत्तार यांना नोटीसा काढू नये. असे विधान त्यांनी महिला आयोगाला उद्देशून केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरत आहेत. त्यांना हे झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, सहा जिल्ह्याचं पालकमंत्री पद, गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद यामुळे तुमच्यावर कामाचा ताण वाढत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते महिलांचा सन्मान करत नाहीत. संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल देवेंद्र फडणवीस का व्यक्त झाले नाहीत. अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस टिकलीवरुन बोलतील का? असा प्रश्न विचारला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा 'नटी' असा उल्लेख करत त्या वासरलेले भांडं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी ठाकरे गटातर्फे जळगावात मोर्चा काढण्यात आला होता.