'कोण राठोड? तो मुलींना पळवून नेणारा राठोड, फालतू...' चंद्रकांत खैरेंची शेलक्या शब्दात टीका
शिवसेना ठाकरे गटाची सध्या शिवसंवाद यात्रा सुरू आहे. ठाकरे गट नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात सध्या ही यात्रा राज्यभराचा दौऱ्यावर आहे. त्यातच ही यात्रा काल औरंगाबादमध्ये होती. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या या यात्रेत गोंधळ झाल्याची घटना समोर आली. या गोंधळावरून आता राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटावर या गोंधळाचा आरोप लावण्यात येत आहे. यावरूनच आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाचे आरोप धुडकावून लावले आहे. त्याबाबतच शिंदे गट मंत्री संजय राठोड यांनी याप्रकरणावर भाष्य केले होते. राठोडांच्या याच प्रतिक्रियेला आता ठाकरे गट नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
मंत्री संजय राठोड यांनी ठाकरे गटाचे आरोप फेटाळून लावले होते. यावरच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, कोण संजय राठोड, तो मुलींना पळवून नेणारा राठोड, फालतू आहे तो, थर्ड क्लास माणसू, काही गोंधळ झाला नाही, गद्दार आमदारांनी केले आहे. आमची पण ताकत आहे पण आम्हाला अडथळा नव्हता आणायचा, मुद्दाम त्यांनी हे सगळं केले. काही लोकांना दारू पाजवून हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप चंद्रकांत खैरेंनी यावेळी केला.
काय म्हणाले होते संजय राठोड?
आदित्य ठाकरेंच्या यात्रेत काल गोंधळ झाला, या गोंधळाचा आरोप ठाकरे गटाने शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर केला. त्यावर बोलताना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे आहोत, आणि रमेश बोरनारे हे अतिशय अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमहत्व आहे. ते असे करणार नाही असे राठोड म्हणाले होते.