मुख्यमंत्र्यांच्या सभेवर केलेल्या राऊतांच्या टीकेला पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, हे चार पाच डाकू...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील दोन्ही गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. याच गोंधळादरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भाषण केले. मात्र, या भाषणावेळी नागरिक त्याठिकाणाहून निघून जाताना दिसून आले. त्यावरूनच ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. याच टीकेवर आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर?
वरळीमधील सभेत गर्दी झाली नाही या संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गर्दी जमवणारी लोक तुम्ही माघारी पाठवून दिली आणि आता दुसऱ्याची गर्दी दाखवून काय उपयोग? तुमच्याकडे काय शिल्लक राहिले आहे. आम्हाला तडीपारी,मर्डरच्या खोट्या केसेस मध्ये अडकवले. जेलमध्ये आम्ही वर्ष वर्ष राहिलो आहे. कधी नगरसेवक न झालेला हा माणूस आज वेगवेगळ्या टीका करत आहे. उद्धव ठाकरे यांना चुकीचे फिडिंग करण्यामध्ये हे चार पाच डाकू लोक होते. त्यांना चुकीचे सांगणारे लोक असल्याने आज पक्षावर ही वेळ आलीये. आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पोलीस चौकशी करतील मात्र असा हल्ला कोणावर होऊ नये या विचारांचा मी असल्याचे गुलाबराव पाटील यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
मुख्यमंत्र्यांच्या सभेवर बोलताना संजय राऊत यांनी ट्विट केले होते. त्यावरच बोलताना ते म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. वरळीतील कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला. कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय. 32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय. बरोबर ना? अशी टीका त्यांनी केली होती.