'श्रीरामाची पुजा केली, तर काय बिघडले?' विरोधकांच्या टीकेवर केसरकरांचा सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात आज त्यांनी अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्यासह भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील होते. परंतु, दुसरीकडे विरोधक या दौऱ्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे. विरोधकांच्या त्याच टीकेला आता शिवसेना मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले केसरकरांनी प्रत्युत्तर?
शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, 'शेतकऱ्यांना शरद पवारांनी वाऱ्यावर सोडले होते. आम्ही कधीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. सततच्या पावसाने हैराण असलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही दिली नाही, तेवढी मदत देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तातडीने मिटवून, त्यांना न्याय देण्याचे काम सरकारने केले. त्यामुळे लोकांची सेवा कशी करावी, हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही.' अशी टीकाही त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, लोकांची सेवा करणाऱ्या राज्याला ‘रामराज्य’ म्हटले जाते. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर आम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवतो, श्रीरामाची पुजा केली, तर काय बिघडले, असा सवाल त्यांनी प्रत्युत्तर देताना केला.