राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोचा उदय सामंतांकडून खुलासा; म्हणाले, ‘खाणेरडं राजकारण’...
निसार शेख|रत्नागिरी: पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी शिंदे–फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शशिकांत वारीशे यांचा खून राजकीय असल्याचे म्हणत एक ट्विट केलं, ज्यात याप्रकरणातील संशयित आरोपी चालक पंढरीनाथ आंबेरकर याचा शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांच्यासोबतचा एक फोटो आहे. या फोटोवरून राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मंत्री उदय सामंत यांचा या प्रकरणाशी संबंध जोडला आहे. मात्र मंत्री उदय सामंत यांनी कुठलातरी पूर्वीचा फोटो दाखवून खाणेरडं राजकारण करणं योग्य नाही, म्हणत राऊतांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काय म्हणाले उदय सामंत?
राऊतांनी केलेल्या आरोपांवर बोलताना उदय सामंत म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत नाणार प्रकल्पाच्या ठिकाणी ज्यांनी जमिनी घेतल्या त्यांची नावं जाहीर करणार आहे, ही नाव त्यांनी जाहीर केलीच पाहिजेत, त्या जमिनीत नेमके दलाल कोण आहे, ते कोणत्या पक्षाचे आहेत हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. म्हणून संजय राऊत यांच्या पत्रात ज्यात नमूद दोन चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या जमिनी कोणाच्या आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला समजलं पाहिजे. माझा ट्विट केलेला तो फोटो जुना आहे. तो फोटो नाकारण्याची आवश्यता नाही, मी मंत्री होऊन रत्नागिरीत गेलो होतो त्यावेळी अनेक जण येऊन फोटो काढतात त्यातील तो एक फोटो होता. तो फोटो काढला म्हणजे आम्ही त्याला पाठबळ दिलं असं होत नाही, त्याचे अनेक फोटो अनेक नेत्यांबरोबर आहेत. जो कोण नेता त्याचाबरोबर आहे, तो त्यात सामील आहे हे असं म्हणणं आणि बदनामीकारक खाणेरड राजकारण करणं योग्य नाही, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.
रोज सकाळी महाराष्ट्रात वेगळं वातावरण निर्माण करण्यापेक्षा त्यांचे ज्या ज्या नेत्यांबरोबर फोटो आहेत त्याची चौकशी करणार आहेत का? असा सवालही उदय सामंत यांनी संजय राऊतांना केला आहे. ते पुढे म्हणाले की, मुद्दा असा आहे की, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणं सोडलं पाहिजे. अशा खाणेरड्या कृत्यांच कोणीही समर्थन करणार नाही. अशी टिका त्यांनी यावेळी केली.
काय केला होता राऊतांनी आरोप?
व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी बेनामी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांत चा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? असा सवाल राऊतांनी या ट्विटमधून उपस्थित केला आहे.दरम्यान पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान यात ठाकरे गटाने या हत्येसाठी सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरले आहे, दरम्यान या हत्याकांडावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आवाज उठवल्याने त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत असल्य़ाची खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे. तुमचाही शशिकांत वारिसे करू, अशा धमक्या संजय राऊत यांना आल्या आहेत. दुसरीकडे राऊत यांनी वारिसे यांची हत्या आर्थिक घोटाळ्यातूनच झाल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी हा आरोप केला आहे.महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? पत्रकार वारीसेंच्या मृत्यू प्रकरणी राऊतांनी फडणवीसांना सवाल केला आहे.