अजितदादा मुख्यमंत्री होतील की नाही हे फक्त तीन नेते सांगू शकतील; प्रकाश आंबेडकर
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचं शिंदे गटाकडून सारखं सांगितले जात आहे. अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा उल्लेख केला जात आहे. यावरुन अनेक चर्चा रंगल्या आहेत. अनेक प्रतिक्रिया देखिल यावर येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे तीनच लोकं सांगू शकतात. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खुद्द अजित पवार हे तीन लोकं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. चौथा माणूस यावर उत्तर देऊ शकणार नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसेच सुनील तटकरे यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, राज्याच्या सरकारमध्ये आम्ही जेव्हा सहभागी झालो, तेव्हाच मुख्यमंत्रिपदावरून स्पष्टता झाली आहे. तशी चर्चा झालेली आहे. आता आम्ही एनडीएचा घटक आहोत. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाचाचा विषयच नाही.