'मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही' आयोध्येतून मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर आज त्यांनी अयोध्येत रामल्लांचं दर्शन घेतलं. रामल्लांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अयोध्यात त्यांचे ज्याप्रकारे स्वागत झाले त्याबद्दल त्यांनी आभार मानले. सोबतच त्यांनी पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांच्यासह मविआवर जोरदार निशाणा साधला. काही लोकांनी हिंदुत्व बदनाम करण्याचे काम करत आहे. काही जणांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचे ते यावेळी म्हणाले.
काही लोकांना आमच्या या अयोध्या दौऱ्याची अॅलर्जी होती...
अयोध्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज शिवसेना आणि भाजप सत्तेत आहे, याचा लोकांना आनंद असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. गेल्या आठ ते नऊ महिन्यात आमच्या सरकारनं चांगलं काम केले. आमचं सरकार सर्वसामान्यांचं आहे. मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही. असा टोला त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.
मी अयोध्येतून अवकाळीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. सत्तेसाठी काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. कालपासून लखनौ विमानतळापासून आमचं स्वागत केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. याठिकाणी सर्वत्र भगवं वादळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाले असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
आजचा दिवस माझ्यासाठी मोठा आनंदाचा
पुढे ते म्हणाले की, दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची बैठक होती. मात्र, तरीसुद्धा रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी ते आले. दर्शन घेतल्यानंतर ते लगेच दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले. आजचा दिवस माझ्यासाठी मोठा आनंदाचा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच माझी अयोध्या यात्रा आहे. महाराष्ट्रात आमच्या विचारधारेबरोबर आम्ही सरकार स्थापन केले. काही लोकांनी हिंदुत्व बदनाम करण्याचे काम करत आहे. काही जणांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्यांनी बदनामी केली त्यांची आज काय स्थिती आहे. हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करु. असा देखील विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.