ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली, त्यांना...; फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : मुंबईमध्ये रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्पावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली आहे, त्यांना दु:ख होतयं की, काँक्रिटचे रस्ते केले तर पुढील 40 वर्ष डांबरी रस्ते करण्याचा विषयच येणार नाही. यामुळे आपली दुकानदारी बंद होणार आहे. त्यामुळे ते ओरड आहेत, असा घणाघात फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे,
काँक्रिटचे रस्ते त्यांच्या काळात झाले नाही, आमच्या काळात होत आहे. एसटीपीच्या संदर्भात केंद्र सरकारकडून परवानग्या आणल्या तरीही आपली भ्रष्टाचार, टक्केवारी, ठरली असल्यामुळे टेंडर निघाले नाही. आम्ही आता वर्क ऑर्डर दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेनं हे वर्कऑर्डर दिले आहे. त्यांचे सरकार असते तर 15 वर्ष वर्कऑर्डर निघालीच नसती, असे टीकास्त्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर सोडले आहे.
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं नाव पत्रिकेमध्ये नाही, याबद्दल मला काही कल्पना नाही. हा कार्यक्रम सरकारचा नसतो, विधिमंडळ हा कार्यक्रम ठरवतो असतो, असे त्यांनी म्हंटले आहे.