राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला? गाडीची मागील काच तुटली
कोलकत्ता : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर आज कथित हल्ला झाला आहे. या घटनेत त्यांच्या कारची मागील काच पूर्णपणे तुटल्याचे समोर येत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील न्याय यात्रा पश्चिम बंगालमधील मालदा येथे असताना ही घटना घडली.
माहितीनुसार, न्याय यात्रा पाहण्यासाठी मालदा जिल्ह्यातील लाभा पुलाजवळ हजारोंचा जमाव जमल्याचे सांगण्यात आले. राहुल बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. त्यांच्या ताफ्याच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात काळ्या एसयूव्हीच्या मागील काचेचा चक्काचूर झाला. काँग्रेस नेत्यांनी याला सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचे म्हटले आहे. एका स्थानिक पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, यावेळी राहुल गांधींच्या गाडीच्या मागे मोठी गर्दी होती. दबावामुळे राहुलच्या कारची मागील काच फुटली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी रोजी मणिपूर येथून सुरू झाली. यात्रेदरम्यान ६७ दिवसांत ६,७१३ किमीचे अंतर कापले जाईल, जे १५ राज्यांतील ११० जिल्ह्यांतून २० मार्चला मुंबईत संपेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रवास काँग्रेस पक्षासाठी मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. मात्र, याचा किती फायदा होईल? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.