मनसेचा एक आमदार गेल्याने चिन्ह गेले का? अंबादास दानवे
मुंबई : शिवसेना व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याबाबतची सुनावणी काल निवडणूक आयोगात पार पडली. परंतु, ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. यावरुन, मात्र आता दोन्ही गटाच्या नेत्यांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मनसे फुटीचा नाव संदर्भ दिला आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, जो युक्तीवाद शिवसेनेकडून होतोय, तो जनतेतून मांडला जातोय. या शिवसेनेच्या मागे जनता आहे. फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना होत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, मनसेचा एक आमदार गेल्याने मनसेचे चिन्ह गेले का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
खासदार आमदार असणे हा एक संघटनेचा भाग आहे. पण, पूर्ण संघटना नाही. शिवसेनेची ही संघटना गावपातळीवर नव्हे तर घराघरात वाड्या-खेड्यात पोहोचली आहे. खाजगी एजंन्सीची चौकशी लावण्याची आम्हाला गरज नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला विधीमंडळात त्याचं तैलचित्र लावलं जाणार आहे. मात्र, या उद्घाटन कार्यक्रामाच्या निमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. याबाबत बोलताना अंबादास दानवे यांनी निमंत्रण दिले की नाही जाणार कि नाही याबाबत स्वतः उद्धव ठाकरे बोलतील, असे म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले आहे.