Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विट म्हणाले...
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. कालच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी करण्यात येईल. 23 ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारीसाठी अर्ज करता येणार असून 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी करण्यात येईल त्यानंतर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. यावर अजित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक सहकाऱ्याने या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
यासोबतच ते म्हणाले की, आता निर्णायक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया. जय महाराष्ट्र! असे अजित पवार म्हणाले.