Kolhapur : कोल्हापुरात महापुराचा धोका कायम; पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली
सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात महापुराचा धोका कायम आहे. पावसामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून कोल्हापूर शहरात पाणी शिरायला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे.
कुंभारगल्ली परिसरात पुराचे पाणी शिरले असून कोल्हापूर जिल्ह्यातील 88 बंधारे पाण्याखाली गेले आहे. राधानगरी धरणाचे ६ स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले आहेत. राधानगरीचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3,4,5,6,7,1 उघडण्यात आले आहे. शाळा महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पंचगंगेची पाणीपातळी 44 फूट4 इंच वर गेली असून धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने पूरग्रस्त भागातील लोकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील वाहतुकीबरोबरच जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ७०० हुन अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.