मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
आज मराठवाडा मुक्तीसंग्राम असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केलं. यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा तसंच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. निजामाच्या आपल्याला कोणत्याच खुणा ठेवायच्या नाहीत, असं सांगताना येणाऱ्या काळात विकास काय असतो, हे शिवसेना दाखवून देईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले त्यांना मला सांगायच आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे आणि अजून खूप विकास होणार आहे.
पाहा मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?
– मराठवाड्यासाठी संतपीठ व्हावं
– निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार
– औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
– औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
– मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प उभारणार
– घृष्णेश्वर सभामंडप उभारणार
– औरंगाबादला पर्यटन समृद्ध
– परभणीत शासकीय महाविद्यालय
– हिंगोलीमध्ये दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी
– सातारा- शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
– सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये
– औरंगाबादमधील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी
– परभणीत शहरात भूयारी गटार योजनेसाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद
– परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेसाठी १०५ कोटी रुपये
– औरंगाबाद – शिर्डी या ११२. ४० किमी मार्गाची श्रेणीवाढ
– उस्मानाबाद शहरासाठी १६८ कोटी रकमेची भूमीगत गटार योजना
– हिंगोलीत हळद प्रक्रिया उद्योगासाठी ४.५० कोटी
– समृद्धी महामार्गाला जालना-नांदेड महामार्गाला जोडणार
-स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन प्रेरणादायी करण्यासारखे उभारणार
– औरंगाबाद सफारी पार्कचा विकास करणार
– नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. ६६ कोटी रुपये खर्च
– हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास ८६ कोटी रुपये खर्च येईल
– घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च
– औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश
– मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास २०० मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार
उद्धव ठाकरे सकाळी 7.30 वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना झाले. सकाळी 8.25 वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ आगमन झालं. सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.40 वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.