Mumbai Rains | “महापालिकेचा पाच वर्षांत १००० कोटींचा घोटाळा”

Mumbai Rains | “महापालिकेचा पाच वर्षांत १००० कोटींचा घोटाळा”

Published by :
Published on

यंदाच्या मोसमातील पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने महानगरपालिकेच्या कारभारावर ताषेरे ओढण्यात येत आहेत. विरोधकांनी देखील पालिकेला लक्ष्य करत टीकेची झोड उठवली आहे.

सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. "पहिल्या पावसातच कटकमिशनचे सगळे व्यवहार उघडे! मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेचि येतो पावसाळा, पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा!" असं ट्वीट करत आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

५ वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा!

दरम्यान, या ट्वीटसोबत पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आशिष शेलार यांनी मुंबईत ५ वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. "पहिल्या पावसामध्ये पुन्हा मुंबई तुंबली. दुर्दैवाने मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला. १०४ टक्के किंवा १०७ टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला. प्रशासनाने काम केलं नाही. कंत्राटदाराने पळ काढला. सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांच्या कृत्यांवर पांघरूण घातलं. मुंबईत दरवर्षाला ७० ते १०० कोटी रुपये खर्च होतात. ५ वर्षांत ५०० कोटी रुपये. ते सोडून छोटे नाले, स्टॉर्म वॉटर ड्रेन, दुरुस्ती वा अन्य कामांसाठीचे दरवर्षाला १०० कोटींप्रमाणे असे ५ वर्षाला ५०० कोटी. म्हणजे ५ वर्षांत १ हजार कोटींचा खर्च करूनही मुंबईकरांच्या नशिबी तुंबलेलं पाणी घरात घुसण्याची वेळ आली", असं आशिष शेलार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com