Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Lokshahi

Ajit Pawar: बारामतीत राष्ट्रवादीच्या जन सन्मान रॅलीत उपमुख्यमंत्री अजित पवार कडाडले; म्हणाले,"अपयश आलं तरी..."

"विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूनं उभा आहे. संपूर्ण राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कानाकोपऱ्यात जाऊन हाच विचार जनतेला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Ajit Pawar Speech: वरुण राजानेही आपल्यावर वर्षाव केला आहे. आपल्याला पाठिंबा दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मी पहिल्यांदाच बारामतीत तुमच्यासमोर आलो आहे. विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूनं उभा आहे. संपूर्ण राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कानाकोपऱ्यात जाऊन हाच विचार जनतेला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी मधल्या काळात जो निर्णय घेतला, तो निर्णय घेताना काहींनी वेगवेगळ्या प्रकारचं मत निर्माण केलं. पण राष्ट्रवादीच्या आमदारांनी विकाससाठी तो निर्णय घेतला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोडं अपयश आलं. पण कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगेन, अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं. विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले ९ आमदार निवडून आले. पण हुरळून जायचं नसतं. यश पचायलाही शिकलं पाहिजे. अपयश आलं तरी खचून न जाता नव्या उमेदीनं लोकांच्या समोर जाण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान रॅलीत बोलत होते.

अजित पवार जनतेला संबोधीत करताना म्हणाले, तशीच तयारी मी आणि माझ्या सहकारी मित्रांनी ठेवली आहे. कालच्या निवडणुकीत शिवाजीराव गरजे असंख्य वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करणारे, सर्वांच्या अडचणी समजून घेणारे ते आहेत. अनेक वर्ष आमच्या सर्वांच्या मनात होतं की त्यांना संधी मिळाली पाहिजे. पण काही ना काही अडणची समोर येत होत्या. काल मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवाजीराल गर्जे यांना आमदार करण्याचं काम केलं. सर्वांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं. परभणीचा राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी देणार होतो. पण काही कारणास्तव आपण थांबलो, आपण महादेव जानकरांना उमेदवारी दिली.

त्यावेळी पहिल्याच सभेत सांगितलं होतं की राजेश सहा महिन्याच्या आता तुला आमदारा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तो निर्णय आता उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला आहे. आपण शब्दाचे पक्के आहोत. आपला वादा पक्का असतो. हे आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे. मला ज्यावेळी अर्थमंत्रालय मिळालं, त्यावेळी मी ठरवलं होतं की आपण विकास आणि गरिबी यासाठी मदत करायची.

महिलांकरीता माझी लाडकी बहिण योजना आणली. काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली. पण त्याला मी फार महत्त्व दिलं नाही. मला खात्री होती, महायुतीच्या वतीनं ती योजना चांगल्या प्रकारे राबवू शकतो. माझ्या गरीब महिलेला आणि मातेला मला मदत करायची होती. माझ्या मुलीला मला मदत करायची होती. त्या पद्धतीचं काम आपण १ जुलैपासून सुरु केलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com