दिवाळीपूर्वी मोदी सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट, 'या' योजनेचा लाभ 2028 पर्यंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मोफत धान्य वितरणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता देशातील गरीब जनतेला पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळणार आहे. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी देशातील सर्वासामान्य जनतेला मोठी भेट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांतर्गत मोफत धान्याच्या वितरणाला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पोषण सुरक्षा वाढवणे हा या मागचा महत्त्वाचा आहे. तसेच या योजनेसाठी केंद्र सरकारने 17 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय देशातील गरजूंपर्यंत मोफत धान्य पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी विकसित करण्यात येणार असल्याची माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसेच या धान्याची गुणवत्ता तपासण्यासाठी 52 प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.