पुण्यात शेतकरी संघटनांनी काढला ट्रॅक्टर मोर्चा! सरकारकडे केल्या 'या' महत्त्वाच्या मागण्या
Pune Farmers Tractor March : विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना एकवटल्या असून पुण्यात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले असून ट्रॅक्टर विधानभवनापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी ट्रॅक्टर विधानभवनपर्यंत नेण्यास विरोध केला. शेती मालावरील निर्यात बंदी रद्द करा, ऊसाला 5 हजार रुपये टन भाव द्या, अशा विविध मागण्यांसाठी रघुनाथ पाटील यांची शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पार्टीकडून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
आम्ही नोटिस द्यायला आलो आहोत. ९ ऑगस्टला मोर्चा काढणार आहोत. हे बेमुदत धरणे आंदोलन असणार आहे. महाराष्ट्रातील आणि देशभरातील सर्व शेतकरी शेतीच्या प्रश्नावर एकत्र येणार आहेत. महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा कलंक लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, असं आपण म्हणतो. इथे रोज ३०-४० शेतकरी आत्महत्या करतात, याची सरकारला आणि राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही. हे थांबलं पाहिजे. शेतीमालावरील निर्यातबंदी उठवली पाहिजे. सोनिया गांधी यांनी अन्न सुरक्षा कायदा सुरु केला. असं असतानाही निर्यात बंदी करून भाव पाडण्याचं काही कारण नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी दिली आहे.